कथारुप यशवंतराव- हे शासनाला परवडणार नाही !

हे शासनाला परवडणार नाही !

मुख्यमंत्री असताना यशवंतराव एकदा सेवाग्रामला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी वर्धा जिल्ह्यातील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. मुख्यमंत्री उत्साही, पुरोगामी व उदार आहेत हे माहित असल्यामुळे पत्रकार मोकळेपणाने प्रश्न विचारीत होते. यशवंतरावही दिलखुलासपणे त्या प्रश्नांची उत्तरे देत होते. इतक्यात एक पत्रकार म्हणाला , ' साहेब, ज्याप्रमाणे प्रत्येक आमदाराला एस. टी. ने मोफत प्रवास करण्याची सवलत आहे, तशीच सवलत पत्रकारांनाही मिळाली पाहिजे. ' यावर साहेब पटकन म्हणाले, ' ते मुळीच शक्य नाही. शासनाला हे परवडणार नाही. ' साहेबांच्या स्पष्ट नकारामुळे वातावरण काहीसे गंभीर झाले. एक जेष्ठ पत्रकार हसत म्हणाले, ' साहेब, तुम्ही आमचा प्रश्न एका मिनिटातच निकालात काढलात. इतर मंत्र्यांप्रमाणे ' तुमच्या मागणीचा विचार करतो ' असेही म्हणाला नाहीत. निदान तुम्ही तसे म्हणाला असतात तरी आम्हाला बरे वाटले असते.'

यावर साहेब म्हणाले, ' हे बघा मित्रांनो, प्रत्येक प्रश्नावर ' बघू ' , ' विचार करू ' असे म्हणत राहिलो तर मग नक्की कोणते प्रश्न सोडवायचे असा प्रश्न निर्माण होतो. सवंग घोषणा करून लोकांना खूश करण्यापेक्षा पाय जमिनीवर ठेवून योजना आखणे जास्त फायद्याचे आहे, असे मी मानतो. राज्य करणा-याने जबाबदारीने आश्वासने दिली पाहिजेत आणि एकदा दिलेली आश्वासने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली पाहिजेत.'

त्या दिवशी उपस्थित पत्रकारांना यशवंतरावांमधील प्रशासकाचे दर्शन झाले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com