कथारुप यशवंतराव-गो अहेड !

गो अहेड !

सन १९६५ साली भारत - पाकिस्तान युद्ध सुरू झाले. यशवंतराव तेव्हा संरक्षणमंत्री होते आणि पंतप्रधान होते लालबहाद्दूर शास्त्री. वेळ फार आणीबाणीची होती. १९६२ च्या पराभवातून देश नुकताच कुठे सावरू लागला होता. अशावेळी देशवासियांचा आत्मसन्मान जपण्याची व सैन्याचे मनोबल वाढविण्याची जबाबदारी यशवंतरावांवर होती. पंतप्रधानांचा त्यांना संपूर्ण पाठिंबा होता. यशवंतराव धैर्याने व चातुर्याने युद्धाची आघाडी सांभाळत होते.

एकेदिवशी संध्याकाळी ते आपल्या कार्यालयात बसलेले असताना हवाईदलाचे व सेनादलाचे अधिकारी घाईघाईने त्यांच्याकडे आले. त्यांच्या चेह-यावर चिंता दिसत होती. ते म्हणाले, ' साहेब, काश्मिर आघाडीवर परिस्थिती गंभीर झालीय. शत्रु पुढे सरकतोय. शत्रूचा वेगही चिंताजनक आहे. शत्रूला थोपविण्याचा आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे विमानातून बॉम्बफेक सुरू करणे. त्यासाठी आम्हाला तुमची व पंतप्रधानांची परवानगी हवी आहे.'

यशवंतरावांनी क्षणभर विचार केला . निर्णय घेणे तर आवश्यक होते. त्यासाठी काही मिनिटांचाच अवधी होता. पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात अर्धा तास तरी गेला असता. यशवंतराव ठाम स्वरात सेनापतींना म्हणाले, ' गो अहेड ! ' त्याप्रमाणे भारतीय हवाईदलाने कारवाई सुरू केली. रात्री उशिरा यशवंतराव पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्रींना भेटले व हवाई दलाला बॉम्बफेकीचे आदेश दिल्याचे सांगितले. शास्त्रीजी म्हणाले, ' अच्छा किया !' या प्रोत्साहनपर शब्दांनी यशवंतरावांना अर्थातच बरे वाटले. पंतप्रधानांच्या संमतीविना त्यांनी एक फार मोठा निर्णय घेतला होता आणि तो अचूक ठरला होता. यशवंतरावांना मनावरचे ओझे हलके झाल्यासारखे वाटले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com