कथारुप यशवंतराव-मी खाऊ आणायला हवा होता !

मी खाऊ आणायला हवा होता !

यशवंतरावांचे नेतृत्व त्यांना वारसाहक्काने लाभले नव्हते. स्वत:च्या कर्तृत्वाने ते अगोदर महाराष्ट्राचे व नंतर देशाचे नेते बनले होते. अगदी सामान्य परिस्थितीतून त्यांचे नेतृत्व पुढे आले होते आणि याच कारणामुळे ' सामान्य माणूस ' हाच शेवटपर्यंत त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. त्यांचे सगळे नातेवाईकही साधेच होते आणि ही नाती जपण्यात यशवंतरावांनी कधीच कमीपणा मानला नाही.

विटा तालुक्यातील हणमंतवाडी या गावात यशवंतरावांची मावशी रहात होती. मुख्यमंत्री असताना यशवंतराव त्या भागाच्या दौ-यावर गेले असताना, वेळात वेळ काढून मावशीच्या घरी गेले. एकेकाळी ज्याला आपण अंगाखांद्यावर खेळवलं तो यशवंता आज महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर पेलतोय, हे पाहून मावशीचा ऊर अभिमानाने भरून आला. घरात शिरलेल्या यशवंतरावांच्या कानशिलावरुन बोटे फिरवत मावशी म्हणाली, ' कोण, येशा हाये व्हय ? लोकं म्हणत्यात तू राजा झालास म्हून ?' इतक्यात मावशीचा सहा सात वर्षांचा नातू धावत बाहेर आला. मळक्या कपड्यातल्या, शेंबूड आलेल्या त्या मुलाने लाडाने यशवंतरावांना मिठी मारली. त्यांचे शुभ्र कपडे मळले. ते पाहून मावशीने नातवाला शिव्या देऊन दोन चापट्या मारल्या. तिला अडवत यशवंतराव म्हणाले, ' मावशी, अगं का मारतेस त्याला ? उलट माझंच चुकलं, येताना मी त्याच्यासाठी खाऊ आणायला हवा होता. देवराष्ट्रेमध्ये असताना मी का कमी घाण करीत होतो ? त्यावेळी तू मला अंगाखांद्यावर घेऊन खेळवत होतीस ना ?' आणि त्या मुलाला खाऊसाठी पैसे देऊन यशवंतराव जायला निघाले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com