यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार- १

१      
तख्त कोणा एका व्यक्तिचे नाही, कोणा एका धर्माचे नाही, कोणा एका वर्गाचे नाही, ते या देशातल्या चाळीस-पंचेचाळी कोटी लोकांचे आहे; आणि त्याचे रक्षण करणे तुमचे आमचे कर्तव्य आहे. तुमचे-आमचे हे तख्त जोपर्यंत चंद्रसूर्य उगवत राहतील तोपर्यंत कायम राहिले पाहिजे. कारण ते आमच्या स्वातंत्र्याचे व लोकशाहीचे प्रतीक आहे, अशा त-हेची देशभक्तीची भावना आपल्या मनात फुलली पाहिजे.


लोकशाही यंत्रणा तयार करणा-या तज्ज्ञ मंडळींनी राजकीय सत्तेवर कायद्याची आणि इतर बंधने घालून ती सत्ता समतोल करून ठेवली आहे; परंतु आर्थिक सत्ता ही राजकीय  सत्तेपेक्षाही अधिक शक्तिमान आहे. सत्ता हे शेवटी सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मग ती सत्ता राजकीय असो अगर आर्थिक असो; आणि म्हणून सत्तेचे स्थान हे लोकांच्या कल्याणासाठी उभारलेली एक वेदी आहे, एक यंत्रणा आहे. ते एक मोठे जोखमीचे काम आहे, ही जाणीव सतत आपल्या मनात असली पाहिजे. यासाठी एकच मार्ग आहे; आणि तो हा की, आपले हे काम लोकशाहीच्या पध्दतीने चालले आहे की नाही याचे कठोर आत्मनिरीक्षण नित्य झाले पाहिजे.


मतभेद केवळ मतभेदांसाठीच असू नयेत. तसे ते असले तर त्यांना वैयक्तिक वा पक्षीय हेव्यादाव्याचे स्वरूप येते; आणि त्याने कार्यहानी होते. विकास कार्याच्याद्वारे लोककल्याण साधावयाचे या ध्येयासंबंधी अर्थातच मतभेद असण्याचे कारण नाही. मार्गासंबंधी मतभेद असू शकतील हे मी मान्य करतो; पण ते मतभेद लोकशाहीच्या मार्गानेच सोडविले पाहिजेत.

४        
आपल्याकडे निवडणुकी आल्या की आपण जागे होतो. मग कोण कोण कार्यकर्ते आहेत, कोणाकोणाच्या मनात बाशिंग बांधावयाचे आहे याचा शोध सुरू होतो; परंतु अशी परिस्थिती असणे उपयोगाचे नाही. ग्रामीण पध्दतीने सांगावयाचे झाले तर पहिलवान असा तयार असला पाहिजे; की सांगेल तेव्हा तो कुस्तीला उभा राहिला पाहिजे. अगोदर करार करून आणि मग खुराक खाऊन अमक्या अमक्या तारखेला कुस्ती लढवतो असे म्हणणे ही कुस्ती नव्हे. बोलणे झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत तो मैदानात आला पाहिजे; आणि कुस्ती झाली पाहिजे. कोणाही कार्यकर्त्याने आंधळे असू नये. आंधळा दुनियेत हिंडू शकेल; पण आंधळ्याच्या मागे दुनिया जाऊ शकणार नाही.

५        
राज्ये जी चालतात ती, राज्ये चालविणा-या माणसांपेक्षा राज्यशक्तीच्या बाहेर जी माणसे असतात त्यांच्या पुण्याईने चालतात. ती माणसे ज्या परंपरा आणि ज्या शक्ती निर्माण करतात त्याच्या सहाय्याने ती चालतात.

६        
धर्म हा व्यक्ती आणि परमेश्वर यांच्यामधला संबंध आहे. हिंदू आपल्या मंदिरात परमेश्वराला आळविण्याचा प्रयत्न करतो, तर मुसलमान आपल्या मशिदीत अल्लाशी संभाषण करण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्ती आपल्या चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, तर शीख गुरूद्वारामध्ये परमेश्वराची प्रार्थना करतो; परंतु हे सर्व संपल्यानंतर मंदिरातून, मशिदीतून, गुरूव्दारातून किंवा चर्चमधून जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, शीख नाही आणि ख्रिस्ती नाही; तो फक्त भारतीय आहे ही भावना आपल्या मनात रूजली पाहिजे.


अगदी साध्या प्रतीकाच्या भाषेत बोलावयाचे झाल्यास मला हिंदुस्थानचे हे चित्र दिसते आहे; की रस्ता डोंगराळ आहे, वेळ उन्हातान्हाची आहे, जवळपास पाणी मिळेलच याची खात्री नाही, साथीला माणसे असतीलच असा भरवसा नाही; परंतु खांद्यावर हे दोन्ही बोजे घेऊन वाटचाल ही केलीच पाहिजे. हिंदुस्थानाची जी सफर चालू आहे त्या सफरीतला आजचा जो मुक्काम आहे त्याचे हे चित्र आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com