व्याख्यानमाला-१९७९-३९

आपल्या समाजाला काळाराम मंदिरात प्रवेश मिळाल्यामुळे आपला इहलोकी अगर परलोकी काही फायदा होणार आहे. असे आंबेडकरांना वाटत नव्हते. आंबेडकर स्वत:ला बुरसटलेल्या हिंदू धर्मात सुधारणा व्हावी व हिंदूधर्मातील सगळे लोक समतेच्या पातळीवर यावेत असे त्यांना मनापासून वाटत होते. म्हणून ते स्वत:ला प्रॉटिस्टंट हिंदू म्हणवून घेत होते व हिंदू म्हणून काळाराम मंदिराच्या देवालयात प्रवेश करण्याचा स्पृश्य हिंदूइतकाच आपल्याला हक्क आहे तो हक्क बजावण्यासाठी म्हणून आंबेडकरांनी हा मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी जवळ जवळ पंधरा हजार अस्पृश्य मंडळी जमा झाली होती. सरळ प्रवेश मिळाला तर ठीक नाहीतर सत्याग्रह करुन देवळात जाण्याचा हक्क ही मंडळी बजावणार होती. परंतु काळाराम मंदिराच्या सनातनी विश्वस्तांनी मंदिरालाच कुलूप घालून देवालाच बंदिस्त करुन टाकले. त्याठिकाणी जमलेल्या अस्पृश्य हिंदूंनी अस्पृश्यांच्यावर दगड-विटांचा मारा करुन त्यांना जखमी केले. हा सत्याग्रह आणि सवर्णांचे अत्याचार बरेच दिवस चालले होते. अखेरपक्षी डॉ. आंबेडकरांनी सनातन्यांच्या अंत:करणाला पाझर फुटत नाही ही गोष्ट जाणून सत्याग्रह मागे घेतला.

डॉ. आंबेडकरांना चवदार तळ्याच्या बाबतीत, पुणे कराराच्या बाबतीत व काळाराम सत्याग्रहाचे बाबतीत जे नाना प्रकारचे कटू अनुभव आले. त्या अनुभवाच्या पोटीच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवले या गावी भरलेल्या अस्पृश्य परिषदेत धर्मांतराची घोषणा केली. आपण हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे निश्चयाचे उद्गार डॉ. आंबेडकरांनी या परिषदेत काढले. त्यामुळे हिंदू समाजाला आणखी एक धक्का बसला. डॉ. आंबेडकर धर्मांतर करणार म्हणून अनेक धर्माचे लोक त्यांचेभोवती घिरट्या घालू लागले. ख्रिश्चनांनी त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला, मुसलमान समाज डॉ. आंबेडकर आपल्या अनुयायासह मुसलमान झाले तर त्यांचे भव्य स्वागत करायला तयार होते. शीख समाजातील मंडळी त्यांचेकडे आली. आपल्या धर्मांतरामुळे इतके कटू अनुभव आले असतांनासुद्धा हिंदू संस्कृतीचे व भारताचे काही नुकसान होऊ नये म्हणून डॉ. आंबेडकरांनी समंजसपणाची व उदारमतवादी भूमिका घेतली त्यामुळे ख्रिश्चन व मुसलान धर्मांत जावयाचे नाही याचा त्यांनी आपल्या मनाशी पक्का निर्णय घेतला. मुसलमानांच्या अगर ख्रिश्चनांच्या बाबतीत बहुतांशी मुसलमानांना अगर ख्रिश्चनांना भारताबद्दल निष्ठा अगर प्रेम फारसे वाटत नाही. त्यांच्या निष्ठा हिंदुस्थानबाहेरील मुसलमान अगर ख्रिश्चन राष्ट्राकडेच असतात. ही गोष्ट डॉ. आंबेडकरांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नव्हती. म्हणून त्यांचा ओढा जरी शीक धर्मांकडे होता तरीसुद्दा निरखून, पारखून संपूर्णपणे विचार करुन शीख धर्मात जावयाचे की बौद्ध धर्माचा स्वीकार करावयाचा याबद्दल त्यांचा विचार चालू होता. त्यांनी शीख धर्माचा तसाच बुद्ध धर्माचा गाढ व्यासंग चालविला व त्यामुळे धर्मांतराचा प्रश्न हा लांबणीवर पडला.

त्यानंतर डॉ. आंबेडकरांचे लक्ष राजकारणाकडे ओढले गेले. अस्पृश्यांचे हितसंबंध योग्य रीतीने रक्षण करावयाचे झाले तर राजकारणाशिवाय तरणोपाय नाही. याबद्दल त्यांची बालंबाल खात्री झाली होती.

१९३५ च्या घटना कायद्याप्रमाणे १९३७ साली जातिविरहित अशा मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका जाहीर झाल्या. डॉ. आंबेडकरांनी 'स्वतंत्र मजूर' पक्षाची स्थापना केली. या पक्षातर्फे यांनी सर्वसामान्य जागा व अस्पृश्यांच्यासाठी असलेल्या राखीव जागा यासाठी उमेदवार उभे केले. एकूण उभे केलेल्या उमेदवारांची संख्या १८ होती. त्या पैकी १४ उमेदवार निवडून आले. डॉ. आंबेडकरांनी पक्षातर्फे काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये हरिजन, शेतकरी, शेतमजूर, कामगार अशा दीन दलित लोकांचे प्रश्न आपण सोडविण्याचा प्रयत्न करु अशी लोकांना हमी दिली होती. त्या हमीप्रमाणे त्यांनी वागायला सुरुवात केली. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर होते व गृहमंत्री कन्हैयालाल मुन्शी होते. काँग्रेस सरकारने असेंब्लीमध्ये औद्योगिक कलह विधेयक मांडले होते. या विधेयकांमध्ये कामगारांचा संप करण्याचा हक्क काढून घेतला होता. संप करण्याचा हक्क हा कामगारांचा मूलभूत हक्क असल्याने मुंबई प्रांतातील कामगारवर्ग या बिलाच्या विरोधात खळवून उठला होता. भिन्न भिन्न पक्षाचे कामगार पुढारी डॉ. आंबेडकरांच्या प्रभावी नेतृत्वाखाली एकत्र आले होते. त्यांनी या कायद्याचा निषेध करण्यासाठी म्हणून काळादिन पाळण्याचे ठरविले. हरताळ पाळला, भव्य मोर्चा काढला आणि अशाप्रकारे कामगार मग तो कामगार कुठल्याही क्षेत्रातील व कोणत्याही संघटनेचा असो. सरकारला विरोध करण्यासाठी आपले प्राण पणाला लावून झगडत राहिला पाहिजे. सरकारने आपल्या पाशवी सामर्थ्यांचे प्रदर्शन करायला कमी केले नाही. खुद्द गृहमंत्री कन्हैयालाल मुन्शी हे विमानात बसून कामगारांचे विराटदर्शन पहात होते. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले व कामगारांना संपाचा हक्क देण्यात आला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com